मुंबई : राज्यात मान्सूनचे आगमन होताच मुसळधार पावसाने जिल्ह्यामध्ये दमदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी पावसाच्या संततधारेमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून काही गावांचा संपर्क तुटला आहे. अशातच हवामान खात्याने पुढच्या तीन तासांसाठी पुन्हा एकदा अलर्ट जारी केला आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क राहत घराबाहेर न पडण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथं येत्या तीन तासात जोरदार मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यामुळे शक्य असल्यास घरातच रहा, हवामानाचा अंदाज घेत महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडा असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे. तीन तासामध्ये पावसाचा जोर वाढणार हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली असून नवी मुंबईतही पाऊस सुरू आहे. येत्या तीन तासामध्ये पाऊस आणखी वाढेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे राज्यासाठी पुढचे तीन तास धोक्याचे आहेत. रत्नागिरीमध्ये 'रेड अॅलर्ट' या आठवड्यामध्ये कोकणामध्ये पुन्हा एकदा जोरदार पाऊस होणार असून रत्नागिरीमध्ये सोमवारसाठी 'रेड अॅलर्ट' जाहीर करण्यात आला आहे. या काळात तुरळक ठिकाणी २० सेंटीमीटरहून जास्त पावसाचा अंदाज आहे. मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये गुरुवारपर्यंत ऑरेंज अॅलर्ट कायम आहे. रत्नागिरीमध्येही मंगळवार ते गुरुवार या कालावधीमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर, सातारा येथे घाट परिसरात सोमवारपासून तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल. पुणे जिल्ह्यामध्ये घाट परिसरात बुधवारी आणि गुरुवारी तीव्र मुसळधार पावसाचा अंदाज आहे. इतर जिल्ह्यांमध्ये काय आहे पावसाचा अंदाज? बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि मध्य भारतावर निर्माण झालेले पूर्व-पश्चिम वाऱ्याचे क्षेत्र यामुळे कोकणात सर्व जिल्ह्यांमध्ये आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. नैऋत्य मोसमी वारे मराठवाड्यावरही सक्रिय आहेत. त्यामुळे मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये या आठवड्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर येथे हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. या भागामध्ये फारसा पाऊस नसेल, असा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यातही सोमवार आणि मंगळवारी पावसाचे प्रमाण काहीसे नियंत्रणात असू शकेल. सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्येही फारसा पाऊस नसेल. औरंगाबादमध्ये गुरुवारी, जालन्यामध्ये बुधवार-गुरुवारी, तर परभणी, हिंगोली, नांदेडमध्ये सोमवार ते बुधवार या कालावधीत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wC1T9r