: जिल्ह्यात हत्येचं सत्र सुरूच असून गुरुवारी बल्लारपुरात आणखी एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने शहरात चांगलीच खळबळ माजली आहे. बल्लारपूर शहरातील सास्ती पुलियाच्या खाली मारोती उर्फ विक्की शंकर काकडे या वेकोली कामगाराचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. तसंच मृतदेह शवविच्छेदनासाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. काही दिवसांपूर्वी वराह पकडण्याच्या क्षुल्लक कारणावरून डॉ.आंबेडकर वार्ड परिसरात एकाची हत्या झाली होती, तर महाराणा प्रताप वॉर्ड परिसरात ४ ते ५ व्यक्तींनी एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. सुदैवाने बल्लारपूर पोलिस दाखल झाल्याने व वेळेवर उपचार मिळाल्यामुळे त्या तरुणाचे प्राण वाचले, मात्र आज शहरात पुन्हा एकदा एका युवकावर धारदार शस्त्राने वार करत गळा चिरून हत्या करण्यात आली. त्यामुळे शहरात पुन्हा गुंडगिरी फोफावत आहे की काय? अशी शंका उपस्थित होत आहे. यापूर्वी चंद्रपूर शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये गोळीबार झाला होता. तर राजुरा शहरात मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एका इसमाची हत्या झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून आरोपीचा शोध सुरू आहे. दरम्यान, या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर पोलिस करत आहेत.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zGxaKm