जालनाः कर्नाटकनंतर आता महाराष्ट्रात देखील ओमिक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये ओमिक्रॉनचा रुग्ण सापडल्याने खळबड उडालीये. सध्या या रुग्णावर उपचार सुरू असून या रुग्णाची तब्बेत चांगली आहे. मात्र त्यांच्यात सौम्य लक्षणं असून या रुग्णाने कोणतंही लसीकरणं केलेलं नव्हतं ही बाब लक्षात घेण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जगभरात ओमिक्रॉनचा धोका वाढल्यानंतर महाराष्ट्रानेही सावधगिरी बाळगत प्रतिबंधात्मक उपाय करण्यास सुरुवात केली होती. मात्र आता अखेर राज्यात पहिल्या ओमिक्रॉनबाधित रुग्णाचं निदान झालं आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून दुबई आणि दिल्लीमार्गे कल्याण डोंबिवलीमध्ये आलेल्या ३३ वर्षीय तरुणामध्ये ओमिक्रॉन हा करोनाचा नवा व्हेरियंट आढळल्याचं प्रयोगशाळा तपासणीतून स्पष्ट झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे वाचाः या रुग्णांच्या संपर्कातील १२ नातेवाईकांचे स्वॅब घेण्यात आले असून २३ संपर्कातील व्यक्तीचे देखील स्वॅब घेण्यात आले आहे. तसेच दिल्लीतून ते मुंबईत आल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या २५ जणांचे देखील स्वॅब घेण्यात आले असून हे सर्व कोरोना निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. मुंबई विमानतलावर आतापर्यत ३ हजार ८३७ जणांचे स्वाब घेतले असून यापैकी ६ जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. मागील महिन्यात बाहेरील देशातून आलेल्या २८ जणांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यांचे रिपोर्ट येणं बाकी आहे. whoया संदर्भात अभ्यास करत असून ICMR या संदर्भात जो निर्णय घेईल त्या नुसार कारवाई केली जाईल असंही टोपे यांनी म्हटल आहे. ओमिक्रॉनला घाबरण्याचे काम नसून नागरीकांनी तातडीनं लसीकरण करून घ्यावे, असं आवाहन त्यांनी केलं आहे. वाचाः ओमायक्रॉन बाबत दक्षिण आफ्रिकेतून माहिती घेतली जात आहे. रुग्णांवर किती परिणाम होतो, उपचार आणि इतर बाबींची माहिती घेतली जात आहे. पूर्ण माहिती मिळाल्यावर आयसीएमआर त्याबाबत प्रोटोकॉल निश्चित करेल. त्यानंतरच त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल. तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. ज्यांनी कोविड लस घेतली नाही, त्यांनी पहिली लस घ्यावी. पहिली घेतली असेल तर दुसरी मात्रा द्यावी, असे आवाहन टोपे यांनी केले. परदेशातून आलेल्या नागरिकांनी आपली चाचणी करून घ्यावी. काही लक्षणे आढळल्यास तत्काळ संबंधित शासकीय दवाखान्यात संपर्क साधावा. कोविड अनुरुप वर्तणूक ठेवावी, मास्क वापरावा, हात वेळोवेळी धुवावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lAFCpR