अमरावती : अमरावती शहरासह ग्रामीण भागात काल मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अमरावतीच्या अचलपूर, परतवाडा, कांडली परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यासंबंधी अचलपूर उपविभागीय अधिकारी यांचेकडून पत्रक जारी करण्यात आलं आहे. भाजप महिला जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी अमरावती ग्रामीण बंदचं आवाहन केलं होतं. अखेर अमरावती शहराची परिस्थिती लक्षात घेता, ग्रामीण भागात शांतता व सुव्यवस्था राहावी याकरिता काही भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ५ हुन अधिक जमाव घालण्यास बंदी आहे. तर काही ठिकाणी इंटरनेट सेवादेखील बंद करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलन चिघळू नये, यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या संदर्भात सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कारवाईचे उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, पालकमंत्र्यांनी आज शहरात अनेक ठिकाणी स्वतः भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली व शहरात शांतता निर्माण होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. प्रशासन, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते, विविध मान्यवर यांच्याशी सातत्यपूर्ण संवाद ठेवून एकोपा राखण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3HibIjj