मुंबईः 'भाजपा हे एक अजबच रसायन आहे. हे लोक आपल्या राजकीय विरोधकांवर बेफाम आरोप करत सुटतात. हवा तसा चिखल उडवतात. तक्रारदारही तेच व फौजदारही तेच असतात. दुसऱ्यांना बाजू मांडण्याची ते संधीच देत नाहीत. त्याच वेळी स्वतःवर जे आरोप पुराव्यांसह होत आहेत त्याबाबत ते स्वतःच स्वतःला क्लीनचिट देत सुटले आहेत. यास काय म्हणावे,' असा खोचक सवाल शिवसेनेनं केला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते यांची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या अभियानाला क्लीन चिट मिळाली असल्याची चर्चा होती. मात्र, सरकारने यावर खुलासा करत जलयुक्त शिवार योजनेला क्लीनचिट मिळाली नसल्याचं म्हटलं होतं. यावरुन शिवसेनेनं भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्ट व्यवहारास क्लीन चिट मिळाली असून फडणवीस सरकारचे याबाबत गंगास्नान झाल्याचा डंका भाजपच्या गोटातून पिटला जात आहे, अशी टीका शिवसेनेनं केली आहे. 'भाजपतर्फे समाज माध्यमांवर तशी ठोकून खोटी माहिती पसरवण्यात आली. प्रसिद्धी माध्यमांची दिशाभूल करुन हे क्लीन चिट प्रकरण रंगवण्यात आले, पण शेवटी सरकारतर्फेच या कट-कारस्थानाचा बुरखा उडवण्यात आला. जलयुक्त शिवाराला कोणीही क्लीन चिट दिली नाही,' असे सरकारने स्पष्ट केले आहे. ‘जलयुक्त शिवारच्या सुमारे ७१ टक्के कामांमध्ये आर्थिक आणि प्रशासकीय अनियमितता झाल्याचे स्पष्ट झाले असून, एसआयटीच्या अहवालाप्रमाणे सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वीच चौकशीचे आदेश दिले आहेत. तथापि जिल्हाधिकाऱ्यांनी एसआयटीच्या निकषाप्रमाणे चौकशी अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे ही सर्व चौकशी चालू असताना सरकारने जलयुक्त शिवार अभियानाला क्लीनचिट देण्याचा प्रश्नच येत नाही, असा खुलासा जलसंधारण विभागानं केला. सरकारचेच स्पष्टीकरण आहे. आता सरकार खोटो बोलते आहे व आम्ही गंगास्नान करुन पापकर्मे धुवून टाकली आहेत, असे जलयुक्त शिवाराची भ्रष्ट डबकी करणाऱ्यांना म्हणायचे आहे काय. पुन्हा आजही हजारो कोटी रुपयांची उधळपट्टी करुन गंगा शुद्धीकरण मोहिमेची स्थिती जल शिवार योजनेसारखी झाली आहे, अशी टीका शिवसेनेनं केली आहे. 'जलयुक्त शिवार योजनेतील ९०० कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले आहेत. त्यामुळं लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून त्यांची चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. हा भ्रष्टाचार वरुन खालपर्यंत खोलवर जिरल्याचे सकृत्दर्शनी दिसत आहे. फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता व त्यामागची भावना नक्कीच चांगली असावी. या योजनेत भाजप पुरस्कृत अनेक ठेकेदारांनी आपले उखळ पांढरे करुन घेतले. त्यामुळं जमिनीत पाणी जिरलेच नाही,' असा टोला शिवसेनेनं लगावला आहे. वाचाः 'जलयुक्त शिवार योजनाही तत्कालीन सरकारचे खाण्या-पिण्याचे- चरण्याचे कुरण बनले. महाराष्ट्रातील जलयुक्त शिवार घोटाळा व बिहारमधील चारा घोटाळा यात साम्य आहे. जनतेच्या तिजोरीची ही सरळ लुटमार आहे. महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणी तपास सुरू केलाच आहे. पण ९, ६३३ कोटी रुपये कोणी, कुठे जिरवले याचा तपास ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांनीही करायला हवा,' अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. वाचाः 'जलयुक्त शिवार योजनेचे लाभार्थी हे राजकीयच निघाले. शेतकऱ्यांचे शिवार कधीच भिजले नाही. खोटेपणाचा कळस असा की, या योजनेतील भ्रष्टाचार, गैरव्यवहाराची चौकशी सुरू असताना आम्हास क्लीनचिट मिळाली, अशा बोंबा ठोकायला या लोकांनी सुरुवात केली. पुन्हा या बोंबाबोंबीस सत्य वगैरे जिंकल्याचा मुखवटा चढवून नाचायला सुरुवात केली. हा तर अजबच प्रकार आहे. म्हणूनच आम्ही म्हणतोय. महाराष्ट्रातील भाजप हे अजब रसायन आहे. रेटून खोटे बोलण्याची दुसऱ्यांवर यथेच्छ चिखल फेकण्याची हिंमत व आत्मविश्वास या रसायनातून येतो. कुठे मिळते हे अजब रसायन? कोणाच्या प्रेरणेतून तयार होते हे अजब - गजब रसायन?,' असे खोचक सवाल शिवसेनेनं उपस्थित केले आहेत.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XTEDbB