Type Here to Get Search Results !

रेल्वेतून प्रवास करताना सोन्याचे दागिने चोरीला; प्रवाशाला नऊ लाखांची भरपाई देण्याचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणेः प्रवाशाला त्रुटीयुक्त सेवा दिल्याबद्दल ग्राहक आयोगाने पुण्याच्या विभागीय रेल्वे कार्यालयाला दणका दिला आहे. रेल्वेच्या 'सेकंड एसी कोच'मधून प्रवास करताना सोन्याचे दागिने चोरीला गेल्याबद्दल विभागीय रेल्वे व्यवस्थापकाने () संबंधित प्रवाशाला नऊ लाख ४३ हजार रुपये देण्याचे आदेश ग्राहक आयोगाने दिले आहेत. पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष उमेश जावळीकर आणि सदस्य क्षितिजा कुलकर्णी व संगीता देशमुख यांनी हा निकाल दिला. विभागीय रेल्वे व्यवस्थापकाने संबंधित प्रवाशाला झालेला मानसिक त्रास व तक्रार खर्चापोटी ३५ हजार रुपये द्यावेत, असेही निकालपत्रात नमूद करण्यात आले आहे. याबाबत मनोज हिरालाल मालू (रा. मुकुंदनगर) यांनी अॅड. हृषीकेश गानू यांच्या मार्फत विभागीय रेल्वे कार्यालयाविरोधात २५ ऑगस्ट २०१६ रोजी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ च्या कलम १२ नुसार भरपाईची मागणी करण्यात आली होती. त्यावर आयोगाने १६ सप्टेंबर २०२१ रोजी निकाल दिला. मनोज मालू आणि त्यांची बायको कविता ११ ते १५ मे २०१५ दरम्यान हैदराबाद येथे विवाह सोहळ्यासाठी गेले होते. विवाह सोहळा आटोपल्यावर १५ मे २०१५ रोजी ते हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेसमधील (रेल्वे १७०३२) 'सेकंड क्लास एसी' आरक्षित कोचमधून पुण्याला परतत होते. त्यांच्याकडे तीन ट्रॉली, दोन हँडबॅग आणि काही मिठाईचे पुडे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वाआठच्या सुमारास रेल्वेने लोणी स्थानक ओलांडल्यावर पाच व्यक्ती 'आपण लष्करातून आले आहोत,' असा दावा करत मनोज यांच्याकडे आले. त्यांनी पुण्यातून या आरक्षित डब्यात आपले सामान ठेवायचे असून, तुमचे सामान उतरविण्यासाठी मदत करू, असे मनोज यांना सांगितले. पुणे रेल्वे स्थानक जवळ आल्याने मनोज यांनी होकार देत आपल्या तीन ट्रॉली आणि दोन हँडबॅग त्यांच्याकडे दिल्या. ते त्यांनी दरवाजाच्या बाजूला ठेवले. सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी रेल्वे पुण्यात पोहोचल्यावर मनोज दरवाजाजवळ पोहोचले असता, त्यांना त्या पाच व्यक्ती दिसल्या नाहीत. त्यानंतर मनोज यांनी हमालाकडून आपले सामान उतरवून घेत घर गाठले. घरी परतल्यावर त्यांनी ट्रॉली बॅग उघडून पाहिली असता, त्यातील सुमारे पावणेदहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे चौदा दागिने गायब होते. खूप शोधाशोध करूनही दागिने सापडले नाहीत. यानंतर मालू यांनी १९ मे २०१५ रोजी रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दिली; तसेच ग्राहक आयोगाकडे धाव घेतली. त्रुटीयुक्त सेवेचा ठपका तक्रारदार आणि विभागीय रेल्वे कार्यालयामध्ये 'ग्राहक' आणि 'सेवा पुरवठादार' यांचे नाते असल्याने, ही तक्रार ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत येते. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, त्यांच्या आरक्षित डब्यात घुसलेल्या व्यक्तींनी बनाव रचून तक्रारदारांना त्यांचे सामान रेल्वेच्या दरवाजाजवळ ठेवण्यास भाग पाडले. त्यामुळे सामानातून दागिने चोरीला गेले. ही रेल्वे प्रशासनाच्या सेवेतील त्रुटी ठरते, असे ग्राहक आयोगाने निकालात नमूद केले आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3bjmkzO

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.