मुंबईः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष यांची बहुचर्चित भेट आज झाली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे ४५ मिनिटे चर्चा झाली मात्र या भेटीत युतीचा प्रस्ताव देण्यात आलेला नाही, तसंच युतीच्या चर्चाही झाल्या नाहीत, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, या भेटीचा योग कसा जुळून आला यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. मनसे- भाजप युतीच्या चर्चा सुरू असताना ही भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मात्र, ही भेट कशी ठरली याबाबतही चंद्रकांत पाटील यांनी नाशिकमधील तो किस्सा सांगितला आहे. 'मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांची आणि माझी नाशिकला अचानक भेट झाली होती. आम्ही दोघेही नाशिक दौऱ्यावर होतो. त्यावेळी आमचं असं बोलणं झालं की, मुंबईत कधीतरी घरी भेटू, त्यानुसार मी त्यांची आज भेट घेतली,' असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. 'पहिला मुद्दा म्हणजे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी का गेले? मग त्यांनी त्यांना भाजपाच्या प्रदेश कार्यालयात का नाही बोलावलं? मूळात मी असा अहंकार मानणारा नाही. भाजपाचीच नाही तर राज्याची ही परंपरा आहे, संस्कृती आहे. की कुणीतरी घरी ये म्हटलं तर आपण हो म्हणतो. यामध्ये कोणी कोणकडे जायचं हा मुद्दा नाही,' असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. 'प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते, यावर माझा विश्वास आहे. नाहीतर नाशिकला तेही जातात मी ही जातो. पण नाशिकमध्ये असं भेटण्याचे काही कारण नव्हतं. आम्ही ठरवून भेटलो नाही. त्यामुळं प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते. मी मागील वर्षभरापासून बोलतोय, की त्यांनी त्यांची भूमिका बदलली पाहिजे. पण समोरासमोर आलो आम्ही नाशिकला. त्यानंतर आजची वेळ यायची होती,' असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ChWfxr